कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Wednesday, July 9, 2014

आले मी पुन्हा, या समुद्रकिनारी
जरा गप्पा मारुयात, नेहमीसारख्या
पण  गप्पा कसल्या त्या
मीच बोलत असते सारखी
आणि तु मात्र गप्प
त्या सागराच्या साक्षीने
निवांत पणे ऐकत राहतोस सारं काही
आणि मी
होत राहते रिती
कुठेही, अगदी कुठेही वाहणारी नदी
जशी या समुद्राकडे विसावा शोधते ना
तसं, अगदी तसं
माझी सगळी सुख, दुख,
स्वप्न, अपेक्षा
सगळ्या तुझ्याचकडे विसावा शोधतात
मन कसं अगदी हलक हलक होतं.
मग,
चल, निघते मी असं म्हणून जरी मी दूर जात राहिले तरी
जशी सागराच्या ओढीने नदी वाहत येतेच,
तशी मीही परत फिरून इथेच येणार आहे
माझ्या या हक्काच्या विसाव्याकडे
हे तुला माहित असतच.
पण  एक प्रश्न मात्र नेहमीच मला सतावतो
कायमच हाकेच्या अंतरावर असणारा तु
नजरेच्या टप्प्यात मात्र कधीच का नसतोस ?
कधीच का नसत तुला नाव, चेहरा ?
असतं फक्त एक अस्तित्व
पुसटस, धुसर, तरीही जाणवणारं
असो,
नदीला तरी कुठे पुरी ओळख असते समुद्राची
तरीही ती धावतेच ना त्याच्या ओढीने
मीही येणारच आहे अशीच नेहमीच
या माझ्या स्वप्नातल्या
हक्काच्या विसाव्यापाशी
आणि
कधी न कधी दिसेलच मला तुझा चेहरा
स्पष्ट

प्रत्येक  माणसाला हवा असतो असा एक सोबती,
एक विसावा मनातलं सांगण्यासाठी, मोकळ होण्यासाठी
बऱ्याचदा हा चेहरा अस्पष्ट असतो, अंधुक असतो.
कधी त्याला आपल्याच जिवलग माणसाचा चेहरा असतो
तर कधी नीट निरखून पाहिलं तर आपलाच चेहरा त्यात दिसतो,
आणि असा माणूस जगात सर्वात एकटा असतो.





No comments:

Post a Comment